…अखेर बिबट्या झाला जेरबंद…!!
जळगाव, दि. १८ – यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात दोन वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्यानंतर अखेर वनविभागाच्या तातडीच्या कारवाईत बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.
दि. १७ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२.३० ते १.०० वाजेच्या सुमारास प्रभाकर चौधरी यांच्या मा.ग.क्र. ७४१ मधील शेतात झोपलेल्या रत्ना सतीश ठेलारी (वय २ वर्षे) हिला बिबट्याने झडप घालून केळीच्या बागेत ओढत नेऊन ठार केले होते. ही मागील महिन्यातील दुसरी घटना असल्यामुळे परिसरात शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
उपवनसंरक्षक श्री. जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) श्री. समाधान पाटील यांच्या नेतृत्वात, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम श्री. सुनील भिलावे, यावल पूर्वचे श्री. स्वप्निल फटांगरे, तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
सदर भागात चार पिंजरे लावण्यात आले. श्री. रविंद्र फाळक (मानद वन्यजीव रक्षक, जळगाव), श्री. अमन गुजर यांच्या सहकार्याने डॉ. यश सागर (पशुवैद्यकीय अधिकारी, TTC जळगाव) व वनपाल गणेश गवळी (शूटर) यांना पिंजऱ्यात तैनात करण्यात आले.
रात्री ९ वाजता बिबट्या पिंजऱ्याजवळ आल्यावर वनपाल गणेश गवळी यांनी अचूक निशाणा साधत बेशुद्धीचे इंजेक्शन टोचले. Thermal Drone च्या सहाय्याने शोध घेत त्याला काही अंतरावर गवतात बेशुद्ध अवस्थेत सापडल्यावर सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले.
बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे.
“नागरिकांनी अशा घटनांमध्ये वनविभागास सहकार्य करावे, त्यामुळे कारवाई यशस्वी होते,” असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक श्री. समाधान पाटील यांनी केले आहे.