सात्री ता.अमळनेर येथे बैलगाडीवर नदीतून पोहचले कर्मचारी आणि ईव्हीम मशीन
……!!!!!
अमळनेर : तालुक्यातील सात्री गावाला पूल नसल्याने आणि बोरी नदीला पाणी आले असल्याने निवडणूक कर्मचारी आणि ईव्हीएम सह साहित्य बैलगाडीवर नेण्याची वेळ प्रशासनावर आली.
१५-अमळनेर मतदार संघाचे मतदान केंद्र क्रमांक ७ तालुक्यातील सात्री येथे आहे. या गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूल नाही. गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसरे मध्ये बुडीत क्षेत्रात येत असल्याने गावाला पूल होत नाही आणि नवीन पुनर्वसित गावचे भूखंड वाटप होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रशासनालाही त्याचा चांगलाच अनुभव आला.
निवडणूकीचे साहित्य आणि कर्मचारी घेऊन बस निघाली. डांगरी गावाला आल्यावर कर्मचारी आणि साहित्य बस खाली उतरवण्यात आले. बोरी नदीला पाणी आलेले असल्याने नदीतून एस टी जाणे शक्य नव्हते आणि साहित्य घेऊन कर्मचाऱ्यांना पायी जाणेही शक्य नव्हते.
मतदान केंद्राध्यक्ष तुषार मनोहर पाटील (गो.प.पाटील, कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव ता.भडगाव) यांनी स्थानिक नागरिक सुनील बोरसे यांच्या सहकार्याने त्यांची बैलगाडी मागवून सर्व साहित्य आणि सर्व कर्मचाऱ्याना बैलगाडीत बसवले. अर्ध्या पाण्यात बैलगाडी आल्यावर वाळूत बैलगाडी फसली. बैलगाडी अडकली म्हणून पोलीस पाटील विनोद बोरसे , सरपंच महेंद्र बोरसे मदतीला धावले. बैलगाडी लोटली आणि पाण्याबाहेर काढली. तेथून कर्मचाऱ्यांना खाली उतरवून वाळूतून पायी केंद्रापर्यंत नेण्यात आले.
गुडघाभर पाण्यात बैलगाडी अडकली. बैलांकडून गाडी ओढली जात नव्हती तेव्हा भीती वाटली. एखाद्या आदिवासी पाड्यावर आलो की काय असे वाटत होते. पोलीस पाटील विनोद बोरसे यांची मदत झाली.
*तुषार मनोहर पाटील, केंद्राध्यक्ष मतदान केंद्र ७ , सात्री ता अमळनेर (गो. पु. पाटील, कनिष्ठ महविद्यालय,कोळगाव,भडगाव)*