समग्र विकास हाच माझा संकल्प : वैशालीताई सूर्यवंशी

समग्र विकास हाच माझा संकल्प : वैशालीताई सूर्यवंशी

 

नगरदेवळा येथील शेतकरी मेळाव्यात जनतेची सेवा करण्याचे अभिवचन

 

 

*पाचोरा* ( *दिनांक 12)*

माझे वडील तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत मतदार संघाचा समग्र विकास करणे हाच आपला संकल्प असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले त्या नगरदेवळा येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या.

 

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मतदारसंघात शेतकरी शिवसंवाद यात्रा काढण्यात येत असून यातच आज नगरदेवळा येथील पाटील मंगल कार्यालयात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर वैशालीताई सुर्यवंशी, केळी तज्ज्ञ राहुल भारंबे, उध्दव मराठे,रमेश बाफना,राजेंद्र पाटील, राजेंद्र देवरे, बाळु पाटील,अरुण पाटील,ॲड. अभय पाटील, शरद पाटील, जे.के. पाटील, दीपक पाटील, मनोहर चौधरी, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, योजना पाटील, तिलोत्तमा मौर्य, धर्मा पाटील, अशोक पाटील, रतन परदेशी, पुष्पा परदेशी, भरत खंडेलवाल आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

 

वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या भाषणात सध्या शेतकरी केंद्र व राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे भरडला जात असल्याची टिका करत विकासाचे व्हिजन मांडले. त्या म्हणाल्या की, आज परिसरात खूप समस्या आहेत. वाढलेला शेती उत्पादन खर्च,हमी भाव, शेत रस्ते, सिंचनाच्या असुविधा यामुळे सर्व जण हैराण असले तरी यावर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. नगरदेवळा सुत गिरणी, कासोदा साखर कारखाना, कजगाव येथील केळीचा माल धक्का, पाचोरा-जामनेर रेल्वे आदी बंद पडले आहेत. तर गिरणा परिसराची दुर्दशा झालेली असून याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मात्र कोणत्याही राजकारण्याला याचे देणेघेणे नाही. ते स्वार्थीपणामुळे हातमिळवणी करून जनतेला मूर्ख बनवत असल्याची टिका त्यांनी केली.

 

अलीकडच्या काळात तर निवडणूक तोंडावर आल्याचे पाहून कुणी ‘शेतकरीपुत्र’ तर कुणी ‘भूमिपुत्र’ म्हणवून घेतोय. मात्र गेल्या दोन वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. मी स्वत:ला ‘कृषी कन्या’ म्हणवते कारण मी असंख्य शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न शेताच्या बांधावर जाऊन सोडविते. हीच माझ्या वडिलांची शिकवण होती. शेतीला आराध्य दैवत मानून मी शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. मतदारसंघातील अवैध धंदे, मुली व महिलांची सुरक्षा आदींवरून देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. मतदारसंघातील महत्वाची गावे असणाऱ्या नगरदेवळा व पिंपळगाव हरेश्वर आदींसारख्या गावांमधील बाजारपेठेत दुर्दशा असून मतदारसंघातील अनेक गावांना पाणी टंचाईचा फटका बसल्यावरून देखील त्यांनी टिका केली. तसेच तात्यासाहेबांप्रमाणेच आपण भय व भ्रष्टाचारमुक्त समग्र विकासासाठी कटीबध्द असल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले. उध्दव ठाकरे यांच्यासारख्या नेतृत्वाला मजबूत करण्यासाठी मी धर्माच्या व सत्याच्या बाजूने मैदानात उतरली असून जनता मला नक्कीच आशीर्वाद देतील असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.

 

याप्रसंगी जैन इरिगेशनचे केळीतज्ज्ञ राहुल भारंबे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केळी लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्यामुळे पाचोरा-भडगावात कृषी क्रांती घडली असून आज त्यांचाच विचार हा शेतकऱ्यांना तारणार असल्याचे देखील आवर्जून नमूद केले.

 

या कार्यक्रमाला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्याला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.