तारखेडा-गाळण रस्त्याचे काम चार दिवसात मार्गी न लागल्यास रेल्वे मार्ग विस्तारीकरण काम बंद पाडू आ.किशोर आप्पा पाटील यांचा अल्टिमेटम 

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आ. किशोर आप्पा पाटील यांचा एल्गार

तारखेडा-गाळण रस्त्याचे काम चार दिवसात मार्गी न लागल्यास रेल्वे मार्ग विस्तारीकरण काम बंद पाडू !आ.किशोर आप्पा पाटील यांचा अल्टिमेटम

पाचोरा (वार्ताहर) दि.१४

पाचोरा तालुक्यातून जाणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गामुळे तारखेडा गाळण नगरदेवळा या परिसरातील तारखेडा बु,तारखेडा खु,चिंचखेडा गाळण (हनुमानवाडी), गाळण बु, गाळण खु,गाळण (विष्णुनगर), चुंचाळे व नगरदेवळा सुमारे दहा गावांचा तालुक्याच्या गावाला जोडणारा रस्ताच बंद झाल्यामुळे सुमारे वीस हजार नागरिकांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान आगामी चार दिवसात या रस्त्याचा विषय मार्गी न लागल्यास आपण रेल्वे मार्ग विस्तारीकरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिला असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एल्गार पुकारला असून रेल्वे प्रशासनाला चार दिवसात काम सुरू करण्याबाबत अल्टीमेटम दिला आहे.

हा प्रमुख रस्ता बंद झाल्याने जनतेचा तालुक्याशी असलेला संपर्क वर्षभरापासून तुटला आहे.रेल्वे प्रशासनाने सदरचा रस्ता करून देण्याबाबत वेळोवेळी आश्वस्त केलेले असताना देखील रस्त्याचे कोणतेही काम झालेला नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चक्क विस्तारीकरणाचे काम बंद पाडणार असल्याचा इशारा दिल्याने त्यांच्या या इशारांमुळे रेल्वे प्रशासनात खळबळ निर्माण झाली असून परिसरातील शेतकरी बांधवांसह परिसरातील नागरिकांनी मात्र त्यांच्या या भूमिकेचे कौतुक केले आहे. तर खासदार स्मिता वाघ यांनी या विषयात पुढाकार घेऊन विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पाचोरा -तारखेडा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्र.३७ ची रेल्वे लगतची जमीन अधिग्रहणकरून पर्यायी रस्त्याची व्यवस्था तात्काळ करणेबाबत रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी बैठकांमधून विनंती केली असताना देखील त्यांनी अद्याप याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही केलेली समोर आलेली नाही.याबाबत वेळोवेळी रेल्वे प्रशासनासह जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, रेल्वे व्यवस्थापक भुसावळ मंडळ, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पाचोरा यांना आमदार किशोर आप्पा पाटिल यांच्यासह “पाचोरा तारखेडा- गाळण शिवकालीन रस्ता संघर्ष समिती” यांच्या वतीने निवेदन दिलेले आहे तसेच रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात बैठका देखील संपन्न झाले आहेत.

सदरील गावांचा दळणवळणा सोबतच आरोग्याच्या दृष्टीनेतालुक्याला पोहचण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.यामुळे आरोग्य सेवा वेळेत न मिळाल्याने जिवीत हानी सुद्धा झाल्याची कैफियत नागरिकांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यापुढे मांडली आहे. तसेच या गावातील शाळकरी मुला-मुलींना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे

या गावांमधून बहुसंख्य मुले-मुली पाचोरा येथे शिक्षण घेण्यासाठी याच रस्त्याचा वापर करीत आहेत आणि हा रस्ता बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.तसेच

या सर्व गावांमधून दररोज हजारो लिटर दुध तालुक्याला आणावे लागते.तसेच शेतक-यांना त्यांचा शेतमालसुध्दा पाचोरा येथे आणण्यासाठी खुप मोठी गैरसोय होत आहे. आणि त्याचा शेतमाल वाहतुकीसाठी रस्ता नसल्याने शेतकरी वर्ग नाराज होत आहे.परिसरातील या सर्व गावातील विद्यार्थी,शासकिय, निमशासकिय कर्मचारी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी विविध कामकाजासाठी येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करीत असतात त्यांचीसुध्दा मोठी गैरसोय सुरू आहे.