होमगार्ड जवानांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सुविधा द्या – आ. सत्यजीत तांबे 

होमगार्ड जवानांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सुविधा द्या – आ. सत्यजीत तांबे

– आ. सत्यजीत तांबेंनी सभागृहात केली मागणी

– मागील अधिवेशनात निर्णय जाहीर करूनही अंमलबजावणी नाही.

 

प्रतिनीधी,

 

राज्यात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे राज्यात होमगार्डचा वापर केला जातो. मात्र होमगार्ड जवान अनियमित सेवेत असल्यामुळे जेव्हा गरज असते, तेव्हा काम दिले जाते. त्यामुळे अनेक वर्षापासून होमगार्ड जवानांची मागणी आहे की, किमान १८० दिवस काम मिळाले पाहिजे. जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह चालू शकतो. होमगार्ड जवानांच्या या मागणी बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र गृह रक्षक दल (होमगार्ड) जवानांना किमान १८० दिवस काम देण्याचं निर्णय जाहीर केला होते. मात्र अजून या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने तातडीने निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.

 

राज्यामध्ये कोणताही सण असेल, वाहतुक पोलीसांच्या मदतीसाठी गृहरक्षक दलांतील जवानांना ड्युटी दिली जाते. सध्या पोलीसांना कायदा व सुवव्यवस्था राखण्यात मदत करण्यासाठी या जवानांची मदत घेतली जाते. त्याचबरोबर एखाद्या आरोपीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात किंवा त्यांना वैद्यकीय मदतीसाठी ने-आण करण्यात होमगार्डची मदत होते. राज्यात सध्या ५३ हजार होमगार्ड कार्यरत आहेत. होमगार्ड जवानांना देखील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.

महाराष्ट्रात वेळोवेळी या होमगार्डस जवानांना वर्षभर काम देण्याची मागणी करण्यात आली होती, त्याचबरोबर त्यांना निश्चित वेतन मिळावं यासाठीही प्रयत्न सुरू होते. सध्या होमगार्ड्सला कोणत्याही प्रकारचे निश्चित वेतन नाहीये. ज्या दिवशी काम असते, त्याच दिवसाचे पैसे त्यांना मिळतात. इतर दिवशी त्यांना रोजगाराचे दुसरे साधन शोधावे लागत असल्यामुळे होमगार्ड जवानांना १८० दिवस काम देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने केली पाहिजे.

– सत्यजीत तांबे, आमदार