१५ अश्वशक्ती पर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज द्या – आ. सत्यजीत तांबे

१५ अश्वशक्ती पर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज द्या – आ. सत्यजीत तांबे

 

– ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने’च्या निकषात बदल करण्याची केली मागणी

 

प्रतिनिधी

 

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज दिली जाते. मात्र, सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत या योजनेच्या निकषांमध्ये बदल करून १५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांनाही मोफत वीज देण्याची मागणी केली आहे.

 

राज्यातील ५०% पेक्षा जास्त शेतकरी हे ७.५ हॉर्स पॉवर पेक्षा जास्त क्षमतेचे शेतीपंप वापरणारे आहेत. या शेतकऱ्यांना देखील मोफत वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ च्या निकषात बदल करून १५ अश्वशक्ती करणे आवश्यक असल्याचे आ. तांबे यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंप वापरणाऱ्यांना शेतकऱ्यांना वीज मोफत दिली जाते. राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाते.

 

ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम शेती क्षेत्रावर झाल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. विविध संकटामुळं अडचणीत सापडलेल्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४” राबवली जाते.